गुरुवार, २६ जुलै, २०१८

गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमा

काही दिवसांपूर्वी एका कामानिमित्त बाहेरगावी गेलो होतो. सकाळी चहा घेण्यासाठी मी आणि माझे  एक वरिष्ठ अधिकारी हॉटेल मध्ये भेटलो. मोठ्या हॉटेलच्या काही खास गमती असतात त्यापैकी एक चहा. गरम पाणी , वेगवेळ्या प्रकारचे आणि ब्रॅण्ड्सचे चहा आणि साखरेचे पुडके घेऊन वेटर आला. चहा बनवण्याची जवाबदारी आमच्यावर होती.
गप्पा मारता मारता चहा तयार देखील झाला. चहाचा पहिला घोट घेतला आणि मला याच समाधान वाटलं कि चहा छान झाला होता. पण माझ्या सोबतच्या त्या अधिकाऱ्याचे तोंड बघण्यासारखे होते. त्याने स्वतः चहा बनवल्यामुळे त्याला जास्त मोकळेपणाने चहाच्या चवीवर टीका करता येत नव्हती. पण दुसरा घोट घेऊन त्यांना आपल्या पातकाची कबुली दिली. आणि समोर मी मोठ्या चवीने चहा पीत  असल्यामुळे  तो आता थोडा  वैतागला होता.
"तुम्हारा चाय अच्छा बना क्या ?"
" एकद्दम बढिया" ( मी नागपुरी खाक्यात सांगितले)
" अजिब बात है?"
" शायद आपने पाणी  मे  शक्कर, दूध मिलाया और  फिर टी bag !! सही ??"
" हा बराबर !"

मी किंचित हसलो, आणि पहिले कपात  फक्त  गरम पाणी घेतले, पहिले टि बॅग त्यात बुडवून चहाचा गडद रंग पाण्याला येई पर्यंत त्या टि बॅगला पाण्यात मनसोक्त विहार करू दिला. मग बाकिचे घटक त्यात टाकले आणि चहा तयार  झाला.
चहा घेतल्या नंतर कितीतरी वेळ त्या गृहस्थाने माझे  कौतुक चालूच ठेवले. मला मात्र आठवण आली ती देसाई सरांची.

भारत विद्यालय अकोला येथे कित्येक वर्षे त्यांनी त्यांनी Chemistry , Maths असले विषय शिकवले. त्यावेळी आह्माला नेहमी प्रश्न पडायचा की यातलं पुढल्या आयुष्यात काय कामास पडेल? पण असले प्रश्न मनात किंवा मित्रांच्या मेळाव्यात बोलण्या पुरतेच असायचे. घरी शाळेत किंवा नातेवाइकांसमोर हे असले प्रश्न विचारण्याचे धाडस कुणी करायचे नाही. पण देसाई सरांची शिकवण्याची पद्धत खूप निराळी होती म्हणून त्यांच्या विषयांच्या बाबतीत असले प्रश्न मनात देखील यायचे नाहीत.

पण आत्ता  त्यांची आणि त्यांनी शिकवलेल्या  गोष्टींची आठवण  कारण वेगळं  होत. त्यांनी Chemistryच्या क्लास मध्ये एक शिकवलेला एक funda आठवला - Solute , Solvent , Solution & Solubility
जे विरघळते ते Solute
ज्यात विरघळते ते Solvent
आणि जे  यातून  तयार होते ते solution.
आणि या सोलुशन मध्ये किती solute  तुम्ही टाकू शकता याची क्षमता म्हणजे solubilioty .
अजूनही लक्ख आठवते फक्त मलाच नाही तर माझ्या सोबत शाळेत शिकलेल्या कित्येक  विद्यार्थ्यांना !! याच श्रेय फक्त देसाई सरांना !!
मी फक्त हे लक्षात ठेवलं नव्हे ते त्यांनी इतक्या सहजपणे शिकवले कि विसरणे शक्य नव्हतं. एखादी गोष्ट समजली आणि आचरणात/ वापरात आणली कि लक्षात राहते. मी चहा बनवतांना हे नेहमी पाळतो की कडक चहा हवा असेल तर फक्त पाणी घ्यायचे गरम करायचे आणि मग त्यात चहा टाकून त्याचा रंग पाण्यात उताराला कि मग बाकीचे पदार्थ त्याला टाकायचे.
एक अजून funda - solvent जर गरम केलं तर त्यात जास्त Solute  टाकू  शकता . साखरेचा पाक करतो तेव्हा हाच उपाय वापरल्या जातो.


कुठल्या शिकलेल्या विषयाचा प्रत्येय किंवा उपयोग कसा होईल सांगता येत  नाही.  डॊळे उघडे आणि डोक  सतर्क  ठेवले तर खूप काही  शिकायला मिळेल. या असल्या सिद्धांतांचा उपयोग नेहमीच्या आयुष्यात ही कमी येतो. आता हेच पहा ना. पाणी (Solvent) गरम केलं  तर त्यात चहा आणि बाकीचे पदार्थ जास्त विरघळतात. आयुष्यातल्या चढ उतारांमधून खडतर जीवन काढून परिस्थितीने होरपलेली माणसे आपल्यात सगळ्यांना सामावून घेतात. केमिस्ट्रीचा नियम आयुष्याच्या एकाद्या वळणावर वेगळ्या स्वरूपात भेटतो. फक्त शिकवायला देसाई सरच हवेत. !!

गुरु पौर्णिमे निमित्य त्यांना आणि अश्याच काही खास लोकांना शतशः प्रणाम !!

अमित जहागीरदार
२६ जुलै २०१८
पुणे
(काही भाग १६ जूनला पुणे- अकोला या प्रवासात लिहिला पण आज पूर्ण झाला )

गुरुवार, २४ मे, २०१८

(जन्मभराच्या) ओळखीचे काका

अकोला ते सांगली हा तब्बल २१-२२ तासांचा कंटाळवाणा प्रवास. मी वालचंद मध्ये admission घेतली तेव्हा मला वाटले नाही कि हा प्रवास इतका मोठा असेन आणि मी जवळच्या लोकांपासून इतका दूर जाईन. अमरावतीमध्ये होतो तेव्हा फक्त आई बाबांपासून दूर होतो पण घर सुटलं नव्हत. अमरावतीला काका-आत्या-मामा होते त्यामुळे मला घरीच राहायला मिळाले पण सांगली म्हणजे वेगळा प्रकार होता. दूर दूर पर्यंन्त कोणी ओळखीचं नव्हत. अकोल्यात सांगली  बँक शिवाय मी सांगलीचा reference कधी ऐकला नव्हता.असो. 

अश्या अनोळखी ठिकाणी आमचा प्रवास चालू झाला. आमचा म्हणजे माझ्यासोबत सौरभ होता. विदर्भाने दिलेला पहिला मित्र सांगलीच्या पुढल्या प्रवासाला. महाराष्ट्र express नावाच्या तद्दन slow गाडीने आम्ही हा प्रवास चालू केला. दिवस गणपतीचे होते. घरचे गौरी गणपती आटोपून आम्ही निघायची तयारी केली. सांगली कसे असेल आणि तिथे आपला निभाव लागेल का असे बरेच प्रश्न मनात होते. अकोल्याहून गाडी पुढे निघाली तश्या आमच्या गप्पा चालू झाल्यात. सोबत एक वयस्कर जोडप होत. काका ५५-५६ चे असतील आणि काकू ५० च्या जवळपास. त्यांनी आमची जुजबी चौकशी केली आणि स्वतःची माहिती पण दिली. काका नागपूरचे आणि हल्ली मुक्काम सातारा. एका सरकारी कंपनी मध्ये नोकरी.  नवीन गाव बघण्याची हौस या वयात पण टिकून असल्यामुळे काकांनी सातार्याला मुक्काम आनंदात हलवला असे कळले.

आई बाबांनी दिलेल्या अनेक सूचनांपैकी एक सूचना हि पण होती कि अनोळखी लोकांशी जास्त ओळख वाढवू नका. जग वाईट असत अस नाही पण लोकांचा स्वभाव ओळखायला लागणारा वेळ आम्हाला मिळाला नव्हता आणि असा प्रसंग आमच्या वर लवकरच आला होता. पण काका आणि काकुंशी बोलतांना थोडं मोकळ वाटत होत. रात्री जेवतांना सोबत घेतलेल्या जिन्नसांची देवाण घेवाण झाली.  तेव्हा अस काही करतांना संशय घेण्याची प्रथा पण नव्हती आणि गरज पण नव्हती. नागपूरहून सकाळी १० वाजताच्या सुमारास निघाल्यामुळे काका-काकूंनी फारच मोजके पदार्थ सोबत घेतले होते. आमच्याकडे असलेल्या पुरणाच्या पोळ्यांवर आम्ही यथेच्छ ताव मारला. विदर्भातील लोकांसाठी पुरणाची पोळी हा जिव्हाळ्याचा विषय आहे. (पूण्यात  कुठल्याही पोळीमधून डाळीच गोड पीठ पडायला लागल की त्याला पुरणाची पोळी म्हणतात.)

दुसऱ्या दिवशी आम्ही "पोस्टल् " addressची देवाणघेवाण केली. तेव्हा आपुलकिचे चार शब्द कागदावर स्वार होऊन यायचे आणि त्यांची उजळणी पण करता यायची. 

प्रवास संपले आणि आम्ही नव्या प्रवाहात मिसळून गेलो. काकांच्या नावाने आणि पत्त्याने diary मधला एक कागद भरला. असे किती पत्ते आणि नाव फक्त डायरीच्या एका पानासाठी आपल्या कडे येतात आणि त्यातले किती मनाचा थांग शोधून तिथे मुक्काम करतात ?? मी डायरी मधली हि नोंद विसरून गेलो होतो. 

साधारण ५-६ आठवड्यांनी एक पत्र आले सौरभच्या नावाने. ते काकांचे होते. त्यांनी साताऱ्याला यायचे आग्रहाचे आमंत्रण दिले होते . सोबत साताऱ्याचा फोन नंबर पण दिला होता. मी त्यांच्या पत्राचे उत्तर पत्रानेच दिले.  मग हा "सिलसिला" असाच चालू राहिला. सौरभने काकांनी दिलेलं आमंत्रण seriously घेवून एक दिवस सातारला जाण्याचा बेत आखला. सकाळी जावून संध्याकाळी येण्याच्या तयारीने गेलेला हा पाठ्या दोन दिवस राहून आला. आल्यावर त्याच्या तोंडी काका आणि काकूंचा विषय बरेच दिवस चालला आणि थोडा मंदावला कि एक पत्र हमखास यायचं. मध्यंतरी काका आणि काकू दोघेही सांगलीला कामानिम्मित्य येवून गेलेत. काकूंनी घरून खूप सारे पदार्थ करून आणले. घरापासून दूर राहत असल्यामुळे आम्हाला आग्रहाच निमंत्रण देण्याची वेगळी गरज पडली नाही. नंतर मी देखील एकदा त्यांच्या कडे राहून आलो. घरापासून इतकं दूर असूनही एक घरच मिळाल होत.

अकोल्यापासून इतक्या दूर राहत असल्यामुळे सगळ्याच गोष्टी घरच्यांसोबत चर्चिल्या जायच्या नाहीत. STD फोनचे दर आणि दूरुन लावून दिली जाणारी घरघर, दोन्ही परवडायचे नाही. मग काही नाजूक विषय काकांसोबत सविस्तर बोलल्या जायचे. आपल्याकडूनच उत्तर काढून घेण्याची कला काकांजवळ असल्यामुळे सापडलेला उपाय सहज आणि सोप्पा वाटायचा. आमच्या असल्या गप्पा तासन् तास चालायच्या. त्या ओढीने जमेल तेव्हा सातारला जाण्याचा प्लान व्हायचा.

माझ्या लग्नात काकांना बोलावण्यासाठी मी फोन केला तेव्हा काका बोलले कि आम्ही जगन्नाथ पुरी च्या यात्रेला जाणार आहोत. माझे लग्न १८ नोव्हेंबर ला आणि काका २० तारखेला परत येणार होते. मी काकांना जास्त आग्रह केला नाही शेवटी त्यांना सगळ्या group ला सोडून येण जमल नसत. पण काही नाती असली बंधन पाळत नाहीत, बंध मजबूत असले कि !! त्यांचा सगळा बेत बदलून काका आणि काकू आमच्या लग्नाला आले होते. कोण कुठे भेटलो भेटी वाढल्या आणि दोन्ही बाजूंनी टिकवल्या गेलेत.

माझ्या वाढदिवसाला काकांचा फोन हमखास  येतो. अगदी कुठेही असले तरी !! नाहीतर मला चुकल्या सारखे वाटते. आणि मी नागपूरला आलो कि त्यांना भेटल्याशिवाय राहत नाही.

नातं मग एका भेटीतल असो किंवा बऱ्याच भेटीतून वृधिंगत झालेल ! वरचेवर भेटून ते टिकवाव लागत. touch मध्ये असण हे एका mouse च्या click मध्ये नाही होत ना. 
त्यासाठी सगळे sense कार्यरत झालेत पाहिजे. नात्यांना गंध असतो, स्वर असतो, स्पर्शाची भाषा असते !!! जपायला सगळे लागतात आणि तुटायला एक सुद्धा कारण होऊ शकतो. 

निर्लेप आणि नि:स्वार्थ नात बनायला कठीण पण टिकवायला सोप्प !!! काकांनी तो विश्वास दिला सगळ्या आयुष्यभरासाठी !!! Thanks लोटे  काका आणि काकू !!!!

(सत्यघटनेवर आधारित पण फक्त १०% च गोष्टी टिपल्या गेल्यात.)

अमित  जहागीरदार
२०-०६-२०१५
नागपूर

गुरुवार, १२ एप्रिल, २०१८

ट्रेन, ती आणि त्याच पाहिलं प्रेम !

ट्रेन, ती आणि त्याच पाहिलं प्रेम !

अमरावती शहराच्या एका टोकाला असलेल्या गाडगेनगरहून बडनेरा स्टेशन असा लांबलचक प्रवास करून अनिकेत आणि त्याचे ३-४ मित्र  महाराष्ट्र एक्प्रेस मध्ये शिरलेसामान जागेवर ठेवलं, गाडी चालू झाली आणि अनिकेत दाराजवळ उभं राहून दिसणाऱ्या बाहेरच्या सरकत्या गोष्टींकडे बघत राहिला. 
बोरिंग सुरवात झालीय ना ??
पण घडलं असच होत. त्याला शोधत गाडीच्या दाराजवळ मित्र आलेत. एकाने खान्द्यावर हात टाकला आणि म्हणाला की, "जाऊ दे रे. ही नाही तर ती.कोणीतरी भेटणार ना"

(खरंतर तो दुसरी मिळणार असं म्हणाला कारण आमच्या विदर्भात माणसं  मिळतात आणि वस्तू भेटतात असं बोलायची पद्धत आहे. पुण्याच्या शुद्ध मराठीत हे नेमकं उलट असत. आमच्याकडची माणसं  माणसात मिसळतात म्हणून असेल कदाचित असा शब्दांचा घोळ, असो ). 
अनिकेत बोलला, "अरे पण मला ती आवडते आणि हे माझं पाहिलं प्रेम होत, I mean आहे !!"
अनिकेतने ट्रेनमधून तोंड थोडं बाहेर काढलं. अचानक मित्राने त्याला आत ओढून घेतलं आणि म्हणाला बावळटा असा काही करू नकोस. अभ्यास कर चांगली नोकरी मिळावं आणि मग अश्या छप्पन्न  पोरी तुझ्याकडे स्वतःहून चालत येतील (तेव्हा अनिकेतच्या यादीत - चांगल्या पोरी होत्या हे याला देखील माहित होत. या गाढवाने मधली "-" काढली आणि त्याला जोडून छप्पन्न हा आकडा सांगिलला असावा)
अनिकेतने त्याचा हात झटकला तर त्याने बाकीच्या एक दोन जणांना आवाज दिला

---
दोन दिवसांपूर्वी अनिकेतला कळले की उद्या रेवतीचा वाढदिवस आहे. त्यावेळी फेसबुक नसल्यामुळे हे असले तपशिल मिळणे आणि मिळवणे फार अवघड प्रकार असायचा. तो या कामाला एक वर्षापसून लागलो तेव्हा कुठे रेवतीच्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी बातमी हाती पडली. आता ही माहिती कशी काढली ही एक मोठी गोष्ट आहे . तो जाम हवेत होतो की तिच्या वाढदिवसाचे निमित्य काढून तिला wish करायचं आणि मग कसा "Response " मिळतो हे बघून काय बोलायचं याचे चांगले  A to Z असे प्लॅन्स देखील बनवले.पण ती college मधली सगळ्यात सुंदर मुलगी असल्यामुळे(प्यार अंधा होता है - म्हणून फक्त त्याला वाटायची नाही तर तिच्या मागे college  मधले आणि बाहेरच्या कॉलेजची पण मुलं असायची) अनिकेतला थोडी भीती पण होती की कुणीतरी आपल्याआधीच try  नको मारायला. तिच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्याने तिला गाठले. तिच्या class मधला एक शांत (?) सुस्वभावी आणि अभ्यासात गती (तिच्यापेक्षा बरीच जास्त) असलेला अनिकेत तिच्यासाठी काही नवीन नव्हतो. तिला विचारले की उद्या येणार आहेस का ?
"?"
"अग सहज विचारले. माझ्याकडे एका टॉपिकवर notes आहेत"
(त्याने सगळ्यात कठीण विषय निवडून ठेवला होता).
ती हो म्हणाली आणि घेऊन ये नक्की हे पण बोलली. भेटण्याची शाश्वती मिळाल्यावर त्याने काय असतो तो एक प्लॅन बनवलातयारी म्हणून एक चांगला शर्ट आणि जीन्स निवडली (जीन्स म्हणजे प्रीमियम प्रकार असायचा त्यावेळी). 
एक छानस ग्रीटिंग निवडलं, गिफ्ट देण्याचा विचार देखील होता पण इतकी इन्व्हेस्टमेंट करायची इच्छा नव्हती आणि परतावा (म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हो ) किती असेल याची काही कल्पना नव्हती.(मनात कितीहि आलं की ती होच म्हणेल तरीपण थोडी रिस्क होतीच ना !)

छान मजकूर असलेलं एक ग्रिटींग घेऊन अनिकेत घरी आला आणि बहिणीकडून त्यावर एक स्वतःचा आणि विशेष असा संदेश लिहिण्याचा मानस होता. पण हे बहीण किंवा भाऊ हे प्रकार खूप रिस्की असतात म्हणून तो पर्याय त्याने निवडला नाही. नंतर तिच्या पण भावंडांचा (विशेषतः भावाचा) विचार आला आणि हस्तलिखित कुठलाही मजकूर नको असा निर्णय घेतला. तसा  ग्रीटींगवरचा मजकूर मैत्रीच्या चौकटीत बसत होता म्हणून स्वतःच बाकीचं बोलून दाखवायचं असा अतिधाडसी निर्णय त्याने घेतला

आणि तो दिवस उजाडला ! सकाळी नेहमीच्या वेळे आधीच अनिकेत कॉलेज मध्ये पोहोचलो. त्यांचे classes चालू व्हायला थोडा अवधी होताती नेहमीच्या जागी म्हणजे गार्डनच्या बाजून असलेल्या खिडकी जवळ असलेल्या दुसऱ्याच बाकावर बसली होती.
प्रसंग देखील बाका होता. या आधी कधीच या असल्या प्रकारचा अनुभव नव्हता
ती खूप सुंदर दिसत होती असे अनिकेतला भासले. आकाशी रंगाचा एक कुर्ता तिने घातला होता. त्यावर केशरी रंगाची ओढणी होती जिला थोड्या [पांढऱ्या रंगाची किनार होती. कुर्त्याच्या बाह्या मोठ्या होत्या ज्यांना एक-दोन  घुंगरू नेहमीप्रमाणे लावलेले असायचे. केसांची जरा वेगळी आणि आजच्या दिवसाला साजेशी अशी रचना केली होती. निळ्या रंगाची पण ड्रेस पेक्षा थोडी फिक्कट रंगाची टिकली होती आणि गळ्यात एक मोत्यांची सुरेख माळ होती. तिच्या डोळे भलतेच नक्षीदार भासत होते आणि या सगळ्यावर मत म्हणजे तिचं  ते विलक्षण आणि बेभान करणार हसू. तशीपण ती खूप गोड आणि खूप जास्त हसायची पण आज काहीतरी निराळं होत हे मात्र खरं. कदाचित त्याच्या मनातल्या विचारांमुळे ती आज जास्त वेगळी आणि सुंदर भासत होती. म्हणतात ना सौंदर्य बघण्याच्या डोळ्यात नसत तर त्याचा मनातल्या विचारांत असत. असल्या विचारात पुढला period  कधी चालू झाला हे कळलंच नाही. तो तसाच खिडकीच्या समोर असलेल्या एका झाडाखाली  आणि तिच्याकडे बघत बसला. तो एक तास एका क्षणाएवढा वाटला. 

पुढला period होणार नाही अशी बातमी आली आणि अनिकेत सुखावला. नशीब त्याच्या बाजूने आहे याची खात्री झाली. (ओम-शांती-ओम हा पिक्चर तेव्हा नव्हता अन्यथा कायनात की काय म्हणतात ते नमूद केलं असत). ती बाहेर येण्याच्या वेळचा अंदाज घेऊन अनिकेत  दाराजवळ पळाला आणि योगायोगाने तिच्या समोर आलोय असा अभिनय केला
" अनिकेत ? तू क्लास मध्ये नव्हतास ? बाप रे , तू आणि दांडी ?"
" अगं तसं काही नाही! आज जरा विशेष काम होत." (क्लास ला दांडी मारल्याने इम्प्रेशन कमी तर नाही झाला ना अशी धास्ती वाटली). 
" हं ! तू माझ्यासाठी काहीतरी आणणार होतास ना ? ( तिला अभ्यासाबद्दल काहीच लक्षात राहात  नाही - मलाच आता काळजी घ्यावी लागेल !!)
" हो आणलाय ना. पण मी माझी बॅग गार्डनच्या बाजूला ठेवलेल्या bikeवर आहे. चल जाऊ या तिकडे ?"
त्यावेळी एका मुलीने जरा बाजूला होऊन एका मुलाशी गप्पा मारणं  म्हणजे मोठी गोष्ट. इतक्या बोलण्यावरून एक -दोन जणांना वाटलं की त्यांचं जमलं सुद्धा. (त्यांच्या तोंडात साखर पडो असा विचार आला अनिकेतच्या मनात). तो आणि रेवती हळू हळू चालायला लागलो. ते दोन-तीन मिनिटांचं अंतर कधीच संपू नये असं वाटत होत. थोड्या अवांतर गप्पा मारत ते दोघे तिथे पोहोचलो आणि त्याने बॅग मधून ते ग्रिटींग काढलं. ती एकदम आश्चर्य चकित झाली. तिने ग्रीटिंग उघडलं. कुठल्याही प्रकारचा धक्का (मनाला गालावर)बसायला नको म्हणून त्याने ग्रीटिंगवर आपल्या नावाखेरीज काहीही लिहिलं नव्हतं

अनिकेतने फार तयारी केली होती याविषयावर. ती काय काय म्हणू शकते आणि त्याचा अर्थ काय घ्यायचा आणि काय उत्तर द्यायचं याचा खूप प्रगल्भ असा विचार अनिकेतने करून ठेवला होता. एक यादीच म्हणा ना - 
मी तुझ्या कडे तश्या नजरेनं .... = मग आता बघ आणि ठरावं . हवं तर अजून वेळ घे !
मला तू भावासारखा ( आमच्यावेळी हा खूप भयंकर प्रकार अस्तित्वात होता) = आत्येभाऊ समज. मामांशी ( म्हणजे तुझ्या बाबांशी बोलायला मी येतो !!
थोडा मोठा हो अजून = माझी माँटुरिटी बघ ( मिशी नाही)
मला खूप मोठं व्हायचंय = हो ना ! दोघेही होऊ या !
माझे घरचे नाही म्हणतील = मला हो म्हण मग बाकीच मी बघतो.
मला तुझा मित्र आवडतो = ठीक आहे ! त्याला बोलावतो लगेच हो म्हण. तुमचा संसार सुखाचा होवो
माझी एक मैत्रीण आहे जी तुला like  करते = आत्ता  बोलावं तिला इथे. जर ती नाही म्हणाली तर तुला हो म्हणावं लागेल.

असले बरेच पर्याय तो  तिच्या समोर ठेवू शकतो असा विचार करून तो तिला त्याच्या मनातली गोष्ट सांगायला पुढे सरसावला. एकदम साधी सुरुवात केली की मला तुला काहीतरी सांगायचं आहे. ती मात्र अजूनही ग्रीटिंग बघण्यात मग्न होती. तो काही बोलणार तेवढ्यात तिची मैत्रीण तिथे आली आणि ओरडली,

" अरे तुह्मी दोघे इथे काय करताय? तिकडे क्लास चालू झाला. दीक्षितसर आलेत आणि सगळ्यांना बोलावलंय. अनिकेत तुझा तर direct  उल्लेख झालाय !चल लवकर."

च्यायला ! हे सर कुठून आलेत आणि हिला आपण का दिसलो? अनिकेतच्या मनात राग आला पण दाखवायची सोया नव्हती. 
रेवती एवढंच बोलली की आम्ही सगळ्या मैत्रिणी कॉफी प्यायला जाणार आहोत संघ्याकाळी तू पण ये तेव्हाच बोलू.
पहिल्यांदा असं झालं की अनिकेतचं क्लास मध्ये मुळीच लक्ष नव्हतं. सगळं कस  रुक्ष रुक्ष वाटत होत. तिच्याकडे बघावं कि नाही हा विचार करण्यात एक दोन periods  तसेच गेलेत. तो  संध्याकाळ होण्याची आतुरतेने वाट बघत होतो
मधल्या काही वेळात रेवती आणि त्याचे प्रॅक्टिकलचे क्लास वेगळ्या जागी होते त्यामुळे ती दिसत नव्हती, त्याला पण थोडा अवधी मिळाला आणि डोक्याला दुसरा विचार !

ती अनिकेतला घेऊन सगळ्या मैत्रिणीसोबत कॉफी प्यायला नेणार होती तरी देखील त्याला असे वाटत होते की हे क्षण माझ्या वाट्याला मिळावे.
तिने सगळ्यांना सांगितले कि अनिकेतला एक difficulty  विचारते आणि मग आपण जाऊया.
"बोल अनिकेत. असा कोणता प्रश्न तुझ्याकडे असेल ज्याचं उत्तर मी देऊ शकेल?"
"आजचा दिवस खास आहे"
"हो माझा वाढदिवस आहे! पण ..."
"आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीचा वाढदिवस म्हणून त्याला जास्त महत्व आहे."
" बाप रे अनिकेत हे काय म्हणतोय ? गंमत आहे!"
" यात कसली गम्मत गं ?
" काय सांगू ? तू मला मोठ्या कोड्यात टाकलंस !"
" अगं सोप्प आहे . तुला मी आवडतो की नाही फक्त एवढंच  ठरवायचं आहे. तुला उत्तर माहित देखील असेल फक्त ते बोलायचं आहे. "
" माझ्या बाबतीत असा प्रसंग येईल असं वाटलं नाही."
"तू सुंदर आहेस हे तर सगळ्यांना माहित आहे. तुला सांगण्याचं धाडस माझ्यात आज आलंय हाच तो फरक. "
"फक्त तुझ्यात नाही रे. तुमच्या तिघांत!"
"म्हणजे?"
" आज मला तू, अनुराग आणि आशिषने propose केलं आणि तिघांनी एकच ग्रीटिंग आणलंय"
असे म्हणून ती जोरात हसायला लागली. हसता  हसता  तिने बॅग मधून तीनही ग्रीटिंग्स काढलेत आणि मला दाखवले. खरंच खाली टाकलेली नावच काय ती वेगळी होती. मला पण  हसू आलं होत पण मी टाळलं
" तू मग उत्तर काय द्यायचं ठरवलं?"
" मला सगळ्यात पाहिलं तू ग्रीटिंग दिलस  पण त्यामागचा हेतू स्पष्ट व्हायला उशीर झाला. अनुराग ने प्रॅक्टिकल ला जातांना गाठलं आणि ग्रीटिंग सोबत त्याच्या मनातली गोष्ट देखील सांगितली. मला थोडा अंदाज आला होता कि तू असं काहीतरी सांगशील पण सगळ्यात पहिले अनुराग बोलला आणि मी त्याला हो म्हटलं"
" हो, अग पहिले जो विचारील त्याला हो म्हणणार होतीस का? "
"अनिकेत, मला काय माहित रे तीन -तीन propose  येतील म्हणून. जे पाहिलं आलं आणि चांगलं वाटलं त्याला मी हो म्हणाले."
" कप्पाळ. दे माझं ग्रिटींग."
तो तसाच निघाला. फर्स्ट क बेसिस वर प्रेम निवडणारी मुलगी म्हणून तिचा तात्विक राग आला होता
अनिकेत खूप दु: खी झाला होतो , पाहिलं propose  सपशेल फेल झालं होत

-----
पण दुसऱ्या दिवशी मित्रांसोबत लास्ट इयरचा प्रोजेक्ट शोधायला पुणे आणि मुंबईला जायचा प्लॅन होता.  त्याने निमूटपणे बॅग भरली आणि सकाळचे दोन periods  आटोपून बडनेरा स्टेशनला पोहोचलोगाडीत चढला आणि सोबतचे मित्र  कालच्या प्रसंगाबद्दल विचारतील म्हणून दरवाज्याजवळ जाऊन उभा राहिलो. मित्राला वाटले की प्रेमभंगाच्या दुःखात तो जीव देणार कि काय? त्याने सोबतीला अजून एक दोन मित्रांना बोलावले.
ते अनिकेतला समजावत होते की जावू  दे रे
" अरे मी गाडीतून बाहेर तोंड काढतोय कारण ..... 
जोऱ्याची हवा असली कि माझ्या डोळ्यात पाणी येत. साल्यांनो पाहिलं प्रेम वा propose काही असो पण मला थोडंही  वाईट वाटत नाहीय !! डोळे ओले नको का व्हायला? मी थोडा सिरीयस नको का वाटायला?"
सगळ्यांनी मला उचलले आणि बाहेर फेकण्याची action करून पाठीवर आणि बसण्याचे प्रॉब्लेम होतील अश्या जागेवर पायाने बदडले.

कुठल्यातरी एका ट्रेन मध्ये आपल्यासाठी एक सीट नक्कीच असते पण reservation करणारा कुणीतरी दुसराच असतो, सीट मिळली नाही म्हणून रडायचं नाही. एक गयी तो दुसरी आयेगी !! ट्रेन भी और ..... 
 
- अमित जहागीरदार 
  एप्रिल २०१८